वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके | |
---|---|
![]() वासुदेव बळवंत फडक्यांचा मुंबईमधील अर्धपुतळा | |
जन्म: | नोव्हेंबर ४, १८४५ शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | फेब्रुवारी १७, १८८३ एडन, येमेन |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे |
वडील: | बळवंत फडके |
वासुदेव बळवंत फडके (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र - फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
अनुक्रमणिका
[लपवा]बालपण आणि शिक्षण[संपादन]
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतीलनरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.[१] येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.[२].
क्रांतीचा पाया[संपादन]
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.[३] १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
सशस्त्र क्रांती[संपादन]
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही. असे सांगून त्यांना निराश केले[४]
फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.
धरपकड, खटला व मृत्यू[संपादन]
जुलै २०, इ.स. १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना[५] कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले[१] व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी मृत्यू आला.[६]
स्मारके[संपादन]
- पुण्यात चाललेल्या खटल्यादरम्यान फडक्यांना संगमपुलाजवळ एका कोठडीत ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर तेथे महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने त्यांचे स्मारक उभारले आहे.
- बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेउन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.[७].
- १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले.
- मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.
- वासुदेव बळवंत फडके यांचे चित्र भारताच्या संसदेमध्ये ३ डिसेंबर, २००४ रोजी लावण्यात आले. हे संसदेत लावण्यात येणारे शेवटचे व्यक्तिचित्र असेल असे ठरविण्यात आले. पी.व्ही. आपट्यांच्या प्रयत्नाने हे चित्र लावण्याची संमती मिळाले. हे तैलचित्र सुहास बहुलकर यांनी रंगवले आहे.
- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नावाचा विश्राम बेडेकर दिग्दर्शित चित्रपट १९५० साली प्रकाशित झाला.[८]
चरित्रे[संपादन]
वासुदेव बळवंत फडके यांची चरित्रे==
- आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर)
- आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - विष्णू श्रीधर जोशी)
शैक्षणिक कार्य[संपादन]
वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते.
No comments:
Post a Comment