अनंत कान्हेरे
(अनंत लक्ष्मण कान्हेरे या पानावरून पुनर्निर्देशित)
अनंत कान्हेरे | |
---|---|
![]() अनंत कान्हेरे यांना फासावर नेताना | |
जन्म: | इ.स. १८९१ |
मृत्यू: | एप्रिल १९, इ.स. १९१० ठाणे, महाराष्ट्र, भारत (फाशी) |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अभिनव भारत |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | विनायक दामोदर सावरकर |
वडील: | लक्ष्मण कान्हेरे |
अनंत लक्ष्मण कान्हेरे (इ.स. १८९१; आयनी मेटे, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - एप्रिल १९, इ.स. १९१०; ठाणे, महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होता. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचा सदस्य होता. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला.
सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.
जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. डिसेंबर २१ इ.स. १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंताने जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिला, त्याला अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एप्रिल १९, इ.स. १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.
ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे.
No comments:
Post a Comment